आमच्या राष्ट्रपित्याचा
आदर्शवाद सांगतो -
वाईट पाहू नका,
वाईट ऐकू नका,
वाईट बोलू नका
आमच्या लोकशाहीचे तीन खांब
अजब चालतात -
न्यायसंस्था काहीच
पाहत नाही
सरकार कुणाचे ऐकत
नाही
प्रशासनाला बोलू
दिले जात नाही
लोकांचा आवाज असलेला चौथा
खांब - माध्यमे -
रोज काहीतरी पाहतात
सदा काहीबाही ऐकतात
तासंतास काहीही बोलतात
आणि लोक तर पूर्ण गोंधळलेले
आहेत -
पाहू नये ते पाहत आहेत
ऐकू नये ते ऐकत आहेत
बोलू नये ते बोलत
आहेत
आदर्शवादाचा कळस फार दूर
आहे
खांबांची अवस्थाही तशी बिकट
आहे
लोकशाही पार मोडकळीला आली
आहे
कारण -
ज्यावर हे दोघे उभे आहेत, ते
लोक
आणि त्या लोकांनी दिलेला पाया
‘साठी’ ओलांडली तरी कच्चाच
आहे !
--- यम (यशवंत महाकाळ)
फेब्रुवारी १८ , २०१४